
महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या आणि जोरदार टीका केली. मात्र, यानंतर आणखी एक धक्का ठाकरेंना बसला, तो म्हणजे सचिन अहिर यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश केला. यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सूचक विधान करून सर्वांच्या भाव्या उंचावल्या आहेत. “मला एखादी ऑफर आली तर मी भविष्यात विचार करेन,” असे विधान त्यांनी केले आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील कौतुक केले आहे. ते म्हणाले, भविष्याच्या दृष्टिकोनात सध्या केंद्रात जाण्यासाठी राज्यात अनेक नेत्यांची नावे घेतली जातात. दिल्लीच्या वर्तुळातून अनेक नेत्यांकडे त्याच नजरेतून बघितले जाते. एखाद्या मराठी माणसाचे नाव इन्फ्रा मॅन म्हणून समोर येत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी यांचे नाव दिल्लीत एका वेगळ्या आदराने घेतले जाते. तसेच नाव देवेंद्र फडणवीस यांचे इन्फ्रा मॅन म्हणून घेतले जात असेल तर चांगली बाब आहे. एक राजकीय पक्ष ही भूमिका बाजूला ठेवून महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ही भावना व्यक्त करत असेल तर त्यात चुकीचे काय? असे मत कोल्हे यांनी व्यक्त केले आहे. एखादी ऑफर आली तर त्याबाबत विचार करू अमोल कोल्हे यांनी पुढे म्हटले की, आतापर्यंत पक्षांतराची कोणतीही ऑफर मला आलेली नाही. अशी एखादी ऑफर आली तर त्याबाबत विचार करू. ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे यांनी पक्ष बदलला तरच पुणे-नाशिक रेल्वे होईल असे असेल, तर ही रेल्वे योजना विकासासाठी आहे की लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून त्यांचे पक्षांतर करण्यासाठी आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. याच सोबत विरोधी पक्षातील आमदार, खासदारांना निधी मिळत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे. पवार साहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर भविष्यात शरद पवार यांचे खासदारही पक्षांतर करू शकतात, असा दावाही अमोल कोल्हे यांनी केला आहे. पवारांचे खासदार फुटणार आहेत, असा दावा केला जात असला तरीही आमचे खासदार कुठेही जाणार नाहीत, असे त्या पक्षातील वरिष्ठांकडून सांगितले जात आहे. याच खासदार फुटीच्या दाव्यावर अमोल कोल्हे म्हणाले, पवार साहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण, आमची इतकी स्वच्छ भूमिका आहे. कुठल्याही वावड्या असतील, चर्चा असतील. या विषयी पवार साहेबांनी अगोदरच सांगितले आहे. त्यामुळे खासदार फुटीचा प्रश्नच उरत नाही, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
