
हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधून मागील पाच वर्षापासून एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विभाग बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बुधवारी ता.1 काढले आहेत. या विभाग बदल्यांमुळे जिल्हा परिषद बदल्यांनी ढवळून निघाली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेचा पदभार हाती घेतल्यापासून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सातत्याने नवीन उपक्रम राबविले आहेत. कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये हिंगोली जिल्हयाने राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. त्यानंतर स्वच्छता व इतर उपक्रम राबविले आहेत. या शिवाय जिल्हा परिषदेत मागील दोन महिन्यापासून बदल्यांचे वारे वाहू लागले होते. त्यानंतर बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये समुपदेशन पध्दतीने झालेल्या बदल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार विभाग अन गाव देण्यात आले आहे. त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल असा दावा केला जात आहे. दरम्यान, मागील 10 वर्षापासून विभाग बदली झालीच नव्हती. सदर बाब लक्षात घेऊन मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी तातडीने विभाग बदलीचे आदेश दिले होते. त्यानुसार शासन निर्णयानुसार विभाग बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या विभाग बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये सामान्य प्रशासन विभाग व लेखा विभागांतर्गत कर्मचाऱ्यांना विभाग बदलून देण्यात आले आहेत. मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने यांच्या मार्गदर्शनाखाली हि प्रक्रिया पार पडली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी ता. 1 देण्यात आले आहे. विभाग बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने इतर विभागा रुजू होऊन कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
