
महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळातून आज रविवारी (१४ जून) पुन्हा एकदा एका मोठ्या आणि खळबळजनक भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावली आहे. मात्र, या अत्यंत संवेदनशील बैठकीच्या काही तास आधीच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे अचानक ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे ठाकरे गटात कमालीची धाकधूक वाढली असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्ली आणि राज्यातील सर्व खासदारांना तातडीने मुंबईत उपस्थित राहण्याचे आदेश दिले असून, आज दुपारी १२:३० वाजता ‘मातोश्री’वर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासून फोन बंद; वाकचौरे कुटुंबियांसह बाहेरगावी? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा मोबाईल फोन आज सकाळपासूनच बंद (नॉट रिचेबल) येत आहे. ते गेल्या दोन दिवसांपासून आपल्या कुटुंबासमवेत बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्या शिर्डी येथील निवासस्थानी सध्या कोणीही नाही. विशेष म्हणजे, त्यांचे स्वीय सहाय्यक देखील त्यांच्यासोबत नसल्याने ते नेमके कुठे गेले आहेत? याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. काही दिवसांपूर्वीच वाकचौरे यांनी शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती, तसेच पक्षाच्या स्थानिक मेळाव्यालाही त्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे त्यांच्या या ‘नॉट रिचेबल’ होण्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात? सध्या राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाचे काही खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भरत गोगावले यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एकूण ९ खासदार निवडून आले आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार, खासदारकी रद्द न होता अधिकृत गट स्थापन करण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी किमान ६ ते ७ खासदारांची (दोन-तृतीयांश बहुमत) आवश्यकता आहे. शिंदे गटाकडून दावा केला जात आहे की, ७ खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. हा संभाव्य बंड रोखण्यासाठी आणि आपल्या खासदारांची निष्ठा तपासण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी ही तातडीची बैठक बोलावली आहे. ठाकरे गटाचा दावा: “अफवांवर विश्वास ठेवू नका!” दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. “गेल्या दोन वर्षांपासून आमचे खासदार संपर्कात असल्याच्या कंड्या पिकवल्या जात आहेत. आमचे सर्व खासदार उद्धव ठाकरेंसोबत आणि ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असून, आजच्या बैठकीला सर्वजण उपस्थित राहतील,” असा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे. परंतु, भाऊसाहेब वाकचौरे ऐन बैठकीच्या वेळीच ‘नॉट रिचेबल’ झाल्याने, महायुतीकडून ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला जाणार का? याचे उत्तर आगामी काही तासांतच स्पष्ट होईल. या खासदारांच्या उपस्थितीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष सध्या लोकसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ९ खासदार असून यामध्ये संजय देशमुख – यवतमाळ, नागेश पाटील-आष्टीकर – हिंगोली, संजय जाधव – परभणी, राजाभाऊ वाजे – नाशिक, अरविंद सावंत – दक्षिण मुंबई, अनिल देसाई – मुंबई दक्षिण-मध्य, संजय दीना पाटील – मुंबई उत्तर पूर्व, भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी, ओमराजे निंबाळकर – धाराशिव यांचा समावेश आहे. यातील शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे ही सध्या नॉट रिचेबल आहेत. ‘मातोश्री’वरील बैठकीत ९ पैकी नेमके कोणते खासदार उपस्थित राहतात आणि कोण गैरहजर राहते, यावर ठाकरे गटाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
