
“बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर देवस्थानच्या परिसर विकास आणि सभामंडपाच्या जीर्णोद्धाराचे काम प्रशासनाने अत्यंत वेगाने व उच्च दर्जाचे केले आहे. पुढील वर्षी सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी येथील ९० टक्के कामे पूर्ण केली जातील,” असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या भव्य विकास आराखड्यामुळे पुढील काळात भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची संख्या ५ ते १० पटीने वाढेल, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची पाहणी केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. परिसर विकासाच्या आराखड्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. या प्रकल्पासाठी जवळपास १५० घरे स्थलांतरित केली जात आहेत. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही चंग बांधला आहे की, या १५० कुटुंबांना अगदी शेजारीच उत्तम जागा देऊन एक सुंदर आणि आदर्श गाव तयार केले जाईल. भीमाशंकरला येणारे भाविक या गावालाही भेट देतील, अशी व्यवस्था केली जात असून यामुळे येथील गावाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलून जाईल.” वाहतूक कोंडी फुटणार; ज्येष्ठांसाठी इलेक्ट्रिक वाहने भाविकांच्या सोयीसाठी भीमाशंकरला येण्याचा आणि जाण्याचा रस्ता वेगळा केला जात आहे, ज्यामुळे भविष्यात येथे वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुलभ प्रवासासाठी परिसरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची सोय केली जाणार आहे. येथील स्थानिक दुकानदारांचे पुनर्वसन करून दुकाने सुव्यवस्थित मांडली जातील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण परिसराचे सूक्ष्म नियोजन (प्लॅनिंग) करण्यात आल्याची माहिती दिली. ‘महाकाल’ पेक्षा वेगळा आणि नैसर्गिक कॉरिडोअर उज्जैनच्या महाकाल कॉरिडोअरशी तुलना सांधताना मुख्यमंत्री म्हणाले, “भीमाशंकर येथील कॉरिडोअर हा महाकालच्या धर्तीवर नाही, तर पूर्णपणे वेगळा असेल. महाकाल हे शहरात आहे, मात्र भीमाशंकर येथे समृद्ध जंगल, जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) आणि अभयारण्य (वाइल्ड लाईफ) आहे. निसर्गाला कुठेही धक्का न लावता, उलट जैवविविधतेला आणि वनविभागाला अधिक चालना कशी देता येईल, याचा विचार करून हा आराखडा तयार केला आहे. शिवशंकराचे निवासस्थान असलेल्या या पवित्र जागेचे प्रसन्न वातावरण आणि निसर्ग अधिक सुंदर करून हा एक ‘नैसर्गिक कॉरिडोअर’ म्हणून विकसित केला जाईल.” पाऊस चांगला पडावा एवढेच मागणे या कामाचा वेग पाहता मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले. शेवटी, यंदा ‘अलनिनो’चे वर्ष असल्याचा संदर्भ देत, “राज्यावरील पाण्याचे संकट टळावे आणि चांगला पाऊस पडावा, यासाठी भीमाशंकराचा आशीर्वाद मिळावा, एवढीच आज चरणी प्रार्थना आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
