
नेरपिंगळाई येथे महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान व खेती बचाव अभियान अंतर्गत तूर पीक व्यवस्थापन विषयावर शेतीशाळेचे पहिले सत्र मंगळवारी यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. या उपक्रमात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती पद्धती आणि तूर पिकाच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शेतीशाळेमध्ये नैसर्गिक शेतीचे महत्त्व, माती परीक्षणाची आवश्यकता, बीज प्रक्रिया, तूर पिकाचे नैसर्गिक व सुधारित व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी याविषयी सखोल माहिती देण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करून आधुनिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर नवले, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक एन. व्ही. गहुकर, सहाय्यक कृषी अधिकारी राहुल पांडे आणि सहाय्यक कृषी अधिकारी कु. शितल शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत तूर पिकातील उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि नैसर्गिक शेतीच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन केले. या शेतीशाळेचे आयोजन पिंगळाक्षी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक राहुल मंगळे यांनी केले होते. कार्यक्रमास गावातील गट सदस्यांसह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तूर पिकाच्या वैज्ञानिक व नैसर्गिक व्यवस्थापनाची उपयुक्त माहिती मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
