
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सर्व जाचक अटी व निकष रद्द करुन शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा या मागणीसाठी राज्य किसान सभा माकपा चांदवड तालुका कमिटीतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या कर्जमाफी शासन अध्यादेशाची होळी करुन संताप व्यत केला. किसान सभेच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यंदा केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच लाभ दिला जाणार आहे. त्यातही उर्वरीत कर्जाची संपूर्ण रकम भरण्याची अट आहे. या जाचक अटींमुळे बहुसंख्य शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप किसान सभेने केला असून या जाचक अटी रद्द करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व सातबारा पूर्णपणे कोरा करावा, या मागणीसाठी अध्यादेशाची होळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात हनुमंत गुंजाळ, तुकाराम गायकवाड, शब्बीर सय्यद, भगवान चौरे, योगेश राऊत आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
