
महानगरातील विविध अनाथ व निराधार गृहात राहणाऱ्या व त्याचप्रमाणे आई-वडिलांचे छत्र हरवून आपल्या नातलगांकडे राहत असणाऱ्या स्वनाथ बालकांसाठी विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या “मामाच्या गावाला जाऊ या’ या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. या बालकांवर विविध संस्काराचे रोपण करण्यात येत असल्याची माहिती विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेच्यावतीने मनुताई कन्या शाळेत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला प्रशांत हरताळकर, विश्व मांगल्य सभेच्या डॉ. वृषाली जोशी, पल्लवी कुलकर्णी, कार्यक्रम संयोजिका आरती लढ्ढा, सोनिया तराळकर यांनी संबोधित केले. शिक्षण, आरोग्य, संस्कार, सुरक्षा व स्वयंरोजगार या पाच सूत्रावर अनाथ व निराधार बालकांच्या पुनर्वसनासाठी विश्व मांगल्य स्वनाथ परिषद सेवाकार्य करत आहे. समाजाच्या मातृशक्तींनी अशी निराधार व अनाथ बालक बालिका एका वर्षासाठी दत्तक घेऊन त्यांच्यावर सुयोग्य शिक्षणाचे संस्काराचे रोपण करून त्यांना आईची माया व प्रेम दिले आहे. अशा या उपक्रमाचे हे तीसरे वर्ष असून, याच अनुषंगाने अशा बालकांच्या सर्वंकष विकास व संस्कारासाठी “मामाच्या गावाला जाऊ या” हा उपक्रम साकार करण्यात आला आहे. या उपक्रमात स्वनाथ असलेल्या ६० बालक, बालिकांनी सहभाग नोंदवला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी बालकांचे तीन दिवसीय सामूहिक शिबिर मनुताई कन्या शाळेत सुरू असून त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. असा होणार समारोप ः तीन दिवशी उपक्रमास विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेच्या निशा टावरी,कल्पना भुतडा,सोनल रायपुरे, माणिक नेरकर, कविता मालू, भाग्यश्री साबळे, पुष्पा वानखडे, अश्विनी जकाते, पल्लवी रावणकर,शोभा गोयनका, सोनल ठक्कर,गीरीजा जागीरदार,संतोष कुलकर्णी, चंदू लड्ढा आदी सेवा देत असल्याचे सांगण्यात आले.या पत्रकार परिषदेत विश्व मांगल्य स्वनाथ परिषदच्या महिला व बालके उपस्थित होते. शिबिराचा प्रारंभ शनिवार, १२ जून रोजी या गुजरात गांधीनगर येथील बाल अनुसंधान विद्यापीठचे कुलपती टी एस जोशी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी झालेले ६० बालक बालिका आपल्या वार्षिक दत्तक माता समवेत विविध मानसिक शारीरिक ,बौद्धिक गुण व कला आत्मसात करीत आहेत. अधिक मासात साकार केलेल्या या उपक्रमास मातृशक्तीनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निराधार व अनाथ बालकांना दत्तक घेऊन आपले सामाजिक दायित्व जोपासले आहे. या तीन दिवसीय शिबिरात बालकांसाठी अनेक करमणुकीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले असून त्यात योग व झुंबा, विविध प्रकारच्या क्रीडा व खेळ,आर्ट व क्राफ्ट, संस्कार, कथाकथन, वकृत्व ,आरोग्य तपासणी व संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे बालक बालिका आपल्या मामाच्या गावाला जातात व सुट्ट्यांचा आनंद घेतात,तशाच पद्धतीचा अविष्कार या उपक्रमाच्या माध्यमातून बालकांना देण्यात येत आहे. शिबिराचा समारोप रविवारी १४ जून रोजी होणार असून, या समारोपीय सोहळ्यात मातृशक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच बालतकांचे आरोग्याशी निगडीत विविध समस्या आणि त्यावर समाधान शोधण्यासाठी देखील महिला मंडळाकडून काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. विविध स्पर्धांमधून घडतायेत बालकांचे बौद्धीक कौशल्य
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
