
मोर्शी शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी येथे मोठा अपघातही घडला होता. नगरपालिका प्रशासनाकडून मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सातत्याने राबवली जात नाही. त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात मोकाट जनावरांचा त्रास अधिक वाढला आहे, ज्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. बसस्थानक परिसर, सिंभोरा चौक, जयस्तंभ चौक, जुने बसस्थानक आणि मुख्य भाजी बाजार यांसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागांत मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अमरावती ते वरुड या महत्त्वाच्या रस्त्यावर मोकाट जनावरे नेहमीच दिसतात. या मार्गावर उपजिल्हा रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालये असल्याने येथे सतत वर्दळ असते. शहरात कोणताही बायपास नसल्यामुळे दुचाकी, चारचाकी, आयशर, ट्रक आणि रेती भरलेल्या वाहनांची वाहतूक याच एकमेव मार्गावरून होते. जनावरांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नागरिकांनी नगरपरिषदेने या जनावरांना पकडून गो-शाळेत जमा करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांच्या मालकांकडून मोठा दंड वसूल करण्याची मागणीही जोर धरत आहे. रस्त्यावर जनावरांमुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. गांधी मार्केटसमोर भाजीबाजार भरतो, जिथे खराब झालेली भाजी खाण्यासाठी जनावरांचे कळप जमा होतात. यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच, अमरावती-वरुड रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध बसलेली जनावरे वाहनचालकांना दिसत नाहीत, ज्यामुळे किरकोळ अपघात घडत आहेत. मोर्शीच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने यांनी सांगितले की, शहरात लाऊडस्पीकरद्वारे मुनादी करून मोकाट जनावरे रस्त्यावर न सोडण्याबाबत मालकांना सूचना देण्यात येत आहेत. यानंतरही रस्त्यावर जनावरे आढळल्यास नगरपरिषदेतर्फे निविदा काढून त्यांना पकडले जाईल आणि मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
