
राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत लक्षवेधी आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानातून एकत्र प्रवास केला आहे. विशेष म्हणजे, या विमान प्रवासात त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे ठाकरे गटाचे प्रमुख नेतेदेखील उपस्थित होते. दोन राजकीय विरोधकांच्या या अनपेक्षित सहप्रवासामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रवासादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात दिलखुलास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी बोलताना, “आपण भेटलो हीच मोठी बातमी आहे,” अशी मार्मिक टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून केल्याचे समजते. यासोबतच, या प्रवासात फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांच्यातही काही काळ चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठे राजकीय वितुष्ट निर्माण झाले आणि तेव्हापासून दोघांचे राजकीय मार्ग पूर्णपणे वेगळे झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते. मात्र, त्यानंतर राज्यात राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का देत त्यांचे सहा खासदार फोडले. या मोठ्या राजकीय घडामोडी आणि फुटीनंतर फडणवीस आणि ठाकरे पहिल्यांदाच असे एकत्र प्रवास करताना दिसले आहेत. खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आता पक्षबांधणीसाठी संबंधित लोकसभा मतदारसंघांचे दौरे करण्याचे निश्चित केले आहे. याच पार्श्वभूमीवर, 27 जून रोजी होणाऱ्या यवतमाळ-वाशिम दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे नागपूरला जात होते. योगायोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील त्याच विमानाने प्रवास करत असल्याने या दोन्ही प्रमुख नेत्यांची गाठभेट झाली. या अनपेक्षित भेटीमुळे आणि विमान प्रवासातील चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
