
नाशिक येथील नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या घटनेने राज्यात गदारोळ माजला असतानाच पुण्यातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील विश्रांती कक्षाचा वापर विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधींसाठी केला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करून भेदभाव आणि नियमभंग आढळल्यास दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिसांना दिले आहेत. संबंधित कंपनीतील पुरुष विश्रांती कक्षांचा वापर विशिष्ट गटांकडून धार्मिक विधींसाठी केला जात आहे. या कालावधीत इतर कर्मचाऱ्यांना विश्रांती कक्षात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे कार्यस्थळी उपलब्ध सुविधांचा समान वापर, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि संस्थात्मक शिस्तीवर विपरीत परिणाम होत आहे, अशा तक्रारी समोर आल्या आहेत. त्यांची तातडीने दखल घेत आमदार माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे लेखी पत्र पाठवून, संबंधित कंपनी प्रशासनाशी समन्वय साधून प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी निष्पक्ष, सखोल आणि कालबद्ध चौकशी करण्यात यावी, आवश्यकता भासल्यास गोपनीय तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव, बळजबरी किंवा नियमभंग आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. नाशिकमध्ये यापूर्वी अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्याचा उल्लेख करत, पुण्यातही तत्सम गैरप्रकार रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यात याव्यात. त्यासाठी संबंधित कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांशी संवाद-समुपदेशनातून त्यांना कोणताही दबाव, छळ किंवा असुविधा भेडसावत आहेत का, याची खातरजमा करावी, असे निर्देश देखील पत्राद्वारे देण्यात आले आहेत. कार्यस्थळी सर्व कर्मचाऱ्यांना समान, सुरक्षित आणि निर्बंधमुक्त सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






