
राज्यात हवामानाचा मोठा विरोधाभास पाहायला मिळत असून, एका बाजूला उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला सोलापूर, पंढरपूर, परभणी आणि इंदापूरसह अनेक भागांत अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. वेगवान वादळी वारा आणि विजांच्या लखलखाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. इंदापूर तालुक्यात रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला असून, कांदलगाव, सरडेवाडी, शहा, हिंगणगाव यासह उजनी पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. या अवकाळी संकटामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. कासेगावात झाडावर वीज पडली पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, तालुक्यातील कासेगाव येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंबासारख्या फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. खर्डीत एकाच दिवसांत 4 वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळली पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावात एकाच दिवसात चार वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण निर्माण झाले आहे. बनकर माळी वस्ती येथील उसाच्या शेतावर वीज पडल्याने पिकाने पेट घेतला, तर मुस्लिम कब्रस्तान परिसरातील कडबा आणि जळकेवाडी येथील नारळाचे व आंब्याचे झाड वीज कोसळून जळून खाक झाले. गेल्या दोन दिवसांत या परिसरात एकूण पाच वेळा वीज पडल्याच्या घटना घडल्या असल्या, तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, निसर्गाच्या या प्रकोपाने खर्डी परिसरात चिंतेचे सावट पसरले आहे. परभणीत वीजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी परभणी जिल्ह्यात दिवसभराच्या असह्य उकाड्यानंतर संध्याकाळी वातावरणात अचानक नाट्यमय बदल झाला. विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने परभणीकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा दिला असला, तरी बळीराजाच्या चिंतेत मात्र मोठी भर घातली आहे. फळबागा आणि इतर पिकांना या पावसाचा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी पावसाचा इशारा कायम ठेवला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी राहण्याचे व सतर्कतेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अक्कलकोट तालुक्याला अवकाळी पावसासह गारपीट सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. तालुक्यातील बोरेगाव, हन्नूर आणि दर्शनाळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः दर्शनाळ येथील शेतकरी अर्जुन गाडेकर यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने साठवलेला गहू, ज्वारी आणि कांदा पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. अनेक भागांत काढून ठेवलेली पीके भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






