
महाराष्ट्र उच्च शिक्षणाच्या संक्रमण अवस्थेतून जात असून, देशातील सर्वाधिक विद्यापीठे आणि महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात देश महाराष्ट्राकडे आशावादाने पाहत असल्याचे मत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले. ते शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या ११० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. डॉ. देवळाणकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात उच्च शिक्षणात ४५ लाख विद्यार्थी असून, तब्बल ६ हजार महाविद्यालये आहेत. उत्तरप्रदेशनंतर ही संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तसेच, देशातील ८६ विद्यापीठे महाराष्ट्रात असून, ही संख्याही सर्वाधिक आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचा ११० वा वर्धापन दिन शिक्षण प्रसारक मंडळीच्या नवी इमारत येथील भाऊसाहेब चितळे सभागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. सदानंद फडके उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल, सदस्य तुषार कुलकर्णी, पराग ठाकूर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या पुणे विभागीय आयुक्त शीतल उगले आणि पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. शैलेंद्र देवळाणकर पुढे म्हणाले की, शिक्षणात गुणवत्ता आणण्यासाठी नॅक मूल्यांकन सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकन असलेली सर्वाधिक महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत. गरजेनुसार अभ्यासक्रम बदलले नाहीत, तर विद्यार्थी याकडे पाठ फिरवतील. त्यामुळे कमी कालावधीचे नवीन अभ्यासक्रम आणणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले की, स.प. महाविद्यालयाने मला घडवले आहे; मी येथे शिक्षक म्हणून रुजू झालो होतो. पुण्यात ३० विद्यापीठे आहेत आणि लवकरच नव्या विद्यापीठांची घोषणा होईल. शिक्षणात स.प. सारख्या स्वायत्त महाविद्यालयांनी बदल घडवून आणावा, असे आवाहन त्यांनी केले. अॅड. सदानंद फडके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्राचीन मूलभूत तत्त्वांचा विसर पडला आहे का, याचा विचार करायला हवा. राष्ट्राला बलवान करण्यासाठी संस्कारी पिढी तयार करावी लागेल. नवीन शिकण्याची इच्छा संपली की वार्धक्याला सुरुवात झाली असे समजावे, त्यामुळे आपण कायम शिकत राहायला हवे. मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांना सवलती द्यायला हव्यात, कारण अशा शिक्षण संस्था आज ओस पडत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
