
छत्रपती संभाजीनगर शहरात वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. आकाशवाणी परिसर आणि दक्षिण भागातील अनेक वसाहतींमध्ये गेल्या महिन्यापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. या समस्येमुळे संतप्त झालेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सोमवारी नगरसेवकांसह महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला. शहरातील नाथनगर, अरिहंतनगर, विश्वभारती कॉलनी, त्रिमूर्ती चौक, बालाजीनगर, शिवशंकर कॉलनी, श्रीकृष्णनगर आणि भावदासनगर या वसाहतींमध्ये दिवसा किंवा रात्री अचानक वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना रात्रीची झोपही घेता येत नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांच्यासमोर नागरिकांच्या तक्रारी मांडल्या. महावितरणचे कर्मचारी फ्यूज कॉलवर फोन उचलत नाहीत आणि दुरुस्तीसाठीही विलंब करतात, असे शितोळे यांनी निदर्शनास आणले. शितोळे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बुधवारपासून विविध रोहित्रांवरील (DP) भार कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राखला जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. या बैठकीला अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांच्यासह कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले, कार्यकारी अभियंता महेंद्र देशमुख आणि संबंधित उपअभियंता उपस्थित होते. भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली जालिंदर शेंडगे, प्रदीप बुरांडे, नंदू गवळी, किशोर मानकापे, शंकर म्हात्रे, अर्चना निळकंठ, पद्मसिंग राजपूत आणि प्रभाग क्र. १९, २० व २१ मधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






