
ज्या ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीच्या विमान अपघातात तीन महिन्यांपूर्वी अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यामुळे पार्थ पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यावर मौन सोडत पार्थ पवार यांनी हा सर्व प्रकार ‘प्रशासकीय चूक’ असल्याचे म्हटले असून, संबंधित ट्रॅव्हल एजंटवर कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. गत २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानत अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले होते. या घटनेला आज तीन महिने पूर्ण झालेत. या घटनेनंतर रोहित पवार यांनी विमानाची देखभाल आणि कंपनीच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. एकीकडे रोहित पवार व्ही. के. सिंग आणि ‘व्हीएसआर’ कंपनीला घेरण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी त्याच कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावर आता पार्थ पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. नेमके काय म्हणाले पार्थ पवार? पार्थ पवार यांनी सोशल मीडियाद्वारे आपली बाजू मांडताना सांगितले की, “पुण्यातील मोदी बाग येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती” एजंटचा करार रद्द, कर्मचाऱ्यांना ताकीद हा प्रकार गंभीर असल्याचे मान्य करत पार्थ पवार यांनी कडक पावले उचलली आहेत. “ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत. तसेच माझ्या कर्मचारीवर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत,” असेही पार्थ पवार यांनी सांगितले. कंपनी विरोधाची भूमिका आजही कायम ‘VSR’ बाबतची आपली विरोधाची भूमिका आजही कायम असल्याचे पार्थ पवार यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले, “VSR Aviation बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे. आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही.” अंजली दमानियांचे बोचरे सवाल: “मुलगा निर्धास्त कसा?” दरम्यान, पार्थ पवार यांच्या स्पष्टीकरणाआधी अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावरून प्रश्नांची सरबत्ती केली होती. “ज्या VSR कंपनीच्या विमान अपघातात तीन महिन्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला, त्याच विमानात मुलगा जातो? त्या VSR कंपनी च्या चौकशीची मागणी करायचे सोडून, त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातो?” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला होता. अंजली दमानिया यांनी केवळ विमानावरच नव्हे, तर पार्थ पवार यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “सुनेत्रा पवारांचे OSD, राम चौबे आणि विकास पाटील, जे सरकारी अधिकारी आहेत आणि सरकारी पगार घेतात, ते पुन्हा एकदा पवारांच्या घरासाठी काम करत आहेत? मी पुन्हा एवढ्यासाठी म्हणत आहे कारण, हेच ते दोघे जे पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थच्या बाजूने उभे होते. तेव्हा अजित पवारांचे PA, आता सुनेत्रा पवारांचे.” प्रश्न साधे आहेत, सरकारी अधिकारी खाजगी कामासाठी कसे जाऊ शकतात? चार्टर फ्लाइटचे पैसे कुणाच्या खिशातून? आणि VSR च्या त्याच विमानात पार्थ पवार बसले तरी कसे? असे सवाल उपस्थित करत, याची उत्तरे जनतेला हवीत, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






