
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना घडली. सेटीस ब्रिजवर उभी असलेली ‘शिवशाही’ बस अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच बसमधून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले आणि आगीने भीषण रूप धारण केले. घटनेमुळे स्टेशन परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस ठाणे येथून पालघरमार्गे बोईसरकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र ठाणे स्टेशनजवळ आल्यानंतर बस अचानक बंद पडली. चालकाने बस तपासण्याचा प्रयत्न करत असतानाच बसच्या खालच्या भागातून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आग लागली. इंजिन आणि डिझेल टाकीजवळून आग लागल्यामुळे ती झपाट्याने पसरली आणि संपूर्ण बसने पेट घेतला. घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे 15 प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी तत्काळ बसमधून बाहेर धाव घेतली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र काही क्षणातच बस पूर्णपणे जळून खाक झाल्याने प्रवाशांचे सामानही नष्ट झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही तत्काळ धाव घेत अग्निशमन दलाला मदत केली. मात्र आगीची तीव्रता इतकी जास्त होती की, बस काही मिनिटांतच पूर्ण जळून गेली आणि केवळ सांगाडा उरल्याचे चित्र दिसून आले. इंजिन गरम झाल्यामुळे आग लागली असावी या घटनेमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंजिन गरम झाल्यामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे वाहनांमध्ये बिघाड होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे या आगीचा संबंधही तापमानाशी असू शकतो, असे बोलले जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






