
अमरावती जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी झाली असली तरी, अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, न उगवलेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. धामणगावचे आमदार प्रताप अडसड यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी जिल्ह्याचे एकूणच चित्र मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. यावर्षी जिल्ह्यात सोयाबीनची विक्रमी पेरणी झाली, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवलेच नसल्याने त्यांच्यापुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. बियाणांमधील दोष हे या समस्येमागील संभाव्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. या गंभीर प्रश्नाकडे आमदार प्रताप अडसड यांनी विधानसभेत लक्ष वेधले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर, बाधित शेतकऱ्यांच्या शेतातील न उगवलेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे करून आवश्यक ती आर्थिक मदत जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. दरवर्षी बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधातही शासन कठोर भूमिका घेणार आहे. राज्यातील अशा संशयित कंपन्यांची चौकशी करण्यात येणार असून, शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे आढळल्यास संबंधित कंपन्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आमदार प्रताप अडसड यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दिले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
