
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. बैठकीनंतर सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला असला, तरी काही खासदार नव्या गटाच्या स्थापनेच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पत्राचा मसुदा आल्यावरच बोलू- राऊत दुसरीकडे, खासदार फुटण्याच्या आणि स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. राऊत म्हणाले की, शिवसेनेचा संसदेत एकच गट आहे, जो खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत मजबुतीने काम करत आहे. खासदार फुटू शकतात, हे आम्ही गेल्या दोन वर्षांपासून ऐकत आहोत. काल सर्वच खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात होते आणि आज सकाळीही आमचे त्यांच्याशी बोलणे झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. खासदार संजय देशमुख आणि इतर दोन खासदारांशी स्वतः उद्धव ठाकरेंनी कामानिमित्त चर्चा केल्याचे सांगत राऊतांनी पुढे आव्हान दिले की, “तरीदेखील काही खासदार हे लोकसभा अध्यक्षांना पत्र द्यायला गेले असतील असे कोणाला वाटत असेल, तर आधी त्या पत्राचा मसुदा बाहेर येऊ द्या, त्यावर आपण मगच बोलू असे राऊत म्हणाले. आम्हाला ऑपरेशन टायगरची गरजच नाही- उदय सामंत यांचा दावा ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी थेट भूमिका मांडली आहे. उदय सामंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’चे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावत, ठाकरे गटाच्या कोणत्याही खासदारासोबत आमचा संपर्क झालेला नाही आणि अशी कोणतीही गुप्त मीटिंग झालेली नाही, असे स्पष्ट केले आहे. आम्हाला अशा कोणत्याही ऑपरेशन टायगरची गरज नाही, असे म्हणत सामंत यांनी ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात नसल्याचेच स्पष्ट सांगितले. यावेळी संजय राऊत यांच्यावर टोमणा मारताना सामंत पुढे म्हणाले की, संजय राऊत यांच्या पेशन्सला दाद दिली पाहिजे, त्यांनीच उबाठा पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. उदय सामंत यांच्या या रोकठोक खुलाशामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चांना आता काहीसा ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राहणार- मुनगंटीवार या संपूर्ण हायव्होल्टेज चर्चेवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी प्रतिक्रिया देत थेट पूर्णविराम लावला आहे. पत्रकारांनी मुनगंटीवारांना विचारले की, ५ खासदार आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय का?’ वर रोखठोक उत्तर देत मुनगंटीवार म्हणाले, पाच खासदार आले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं काही नाही. स्वतः शिंदेंनी विधानसभा निवडणुकीच्या वेळीच जाहीर केले होते की ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नाहीत. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत आणि तेच राहणार आहेत. मुनगंटीवारांच्या या विधानामुळे मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य चर्चेला आता ब्रेक लागला आहे. अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
