
वडिलांवर ग्रामीण बँकेचे असलेले कर्ज कसे फेडावे तसे शिक्षणावर होणाऱ्या खर्चाच्या चिंतेतून 19 वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णा तालुक्यातील मरसुल येथील योगेश कदम (19) या तरुणाला इयत्ता बारावी मध्ये 51 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर तो पोलिस भरती तसेच सैन्य भरतीची तयारी करू लागला होता. घरी तीन एकर जमीन असून या जमिनीच्या उत्पन्नावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. दरम्यान या जमिनीवर योगेश याचे वडील दशरथ कदम यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून सुमारे दीड लाख रुपयाचे कर्ज काढले होते. सतत होणारी नापिकी तसेच शिक्षणाचा वाढता खर्च यामुळे योगेश चिंतेत होता. वडिलावरी कर्ज कसे फेडावे व शिक्षणाच्या खर्चाच्या चिंतेमध्ये त्यांनी वडिलांना आता मी शिक्षण शिकत नाही कर्ज खूप होत आहे असे सांगितले. मात्र तू पुढे शिक्षण घे व नोकरी कर शिक्षण व भरतीच्या तयारी साठी लागणारा खर्च करण्यास मी तयार आहे, असे दशरथ यांनी समजावून सांगितले होते सांगितले. त्यानंतर योगेश हा काही दिवसांपूर्वीच वसमत येथे त्याच्या आत्याकडे आला होता. आत्याकडे जेवण करून तो बाहेर जाऊन येतो असे सांगून निघाला. त्यानंतर विषारी औषध प्यायले अन रात्री घरी आला. यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने विषारी औषध पिल्याचे त्याच्या आत्याला सांगितले. त्यांनी योगेश यास तातडीने उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र योगेश ची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच योगेश चा मृत्यू झाला. याप्रकरणी दशरथ कदम यांनी वसमत पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून बुधवारी तारीख 24 आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, जमादार शेख शमी पुढील तपास करीत आहेत. मयत योगेश यांच्या पश्चात आजी आई-वडील व एक भाऊ असा परिवार असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
