
येत्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीने मंजुरी दिल्यानंतर, पाच मुख्य जागांसाठी आणि एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव आणि अहिल्यानगरमधील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावांचा समावेश असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत संघटनात्मक कामात सक्रिय असलेल्या नेत्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. १. प्रमोद जठार (सिंधुदुर्ग): कोकणातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जठार यांना संधी देऊन भाजपने कोकण किनारपट्टीवर पक्षाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. २. विवेक कोल्हे (अहिल्यानगर): कोपरगावमधील कोल्हे घराण्याचे वारसदार आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३. संजय भेंडे (नागपूर): भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि नागपूरचे माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या भेंडे यांना संधी देऊन विदर्भातील संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. ४. माधवी नाईक: गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माधवी नाईक यांना पक्षाने मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ५. सुनील कर्जतकर: पक्षाच्या विश्वासू आणि दीर्घकाळ काम करणाऱ्या नेत्यांपैकी एक असलेल्या कर्जतकर यांच्या नावावरही मोहोर उमटवण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांना ‘बक्षीस’ काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांना भाजपने त्यांच्याच रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. पक्षांतराचा हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे. कोण आहेत विवेक कोल्हे? अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात कोपरगावचे ‘काळे-कोल्हे’ हे द्वंद्व सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचा धर्म पाळत कोल्हेंनी संयम राखला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घेतलेली भेट ही उमेदवारीसाठी महत्त्वाची ठरल्याचे मानले जात आहे. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचा राजकीय वारसा ते आता विधान परिषदेत पुढे नेणार आहेत. प्रादेशिक समतोल आणि रणनीती प्रमोद जठार यांच्या उमेदवारीने कोकणावर अन्याय होत असल्याची भावना दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे, तर संजय भेंडे यांच्या माध्यमातून नागपूरमधील पकड कायम राखली आहे. अहिल्यानगरमध्ये कोल्हे यांना संधी देऊन पश्चिम महाराष्ट्रातील ताकद वाढवण्याची भाजपची रणनीती स्पष्टपणे दिसून येत आहे. उमेदवारी अर्जाची शेवटची मुदत ३० एप्रिल निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३० एप्रिल २०२६ हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपने अवघ्या दोन दिवस आधी ही नावे जाहीर करून सस्पेन्स संपवला आहे. या निवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. आता महायुतीमधील इतर घटक पक्ष (शिवसेना – शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस – सुनेत्रा पवार गट) आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर कोणाची वर्णी लावतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या ५ नावांच्या घोषणेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






