
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या धोरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असतानाच, आता राजस्थान राज्यात मराठी भाषेवरून नवा वाद पेटला आहे. राजस्थानचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राजस्थानात ‘मराठी स्टडी सेंटर’ सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर तेथील स्थानिक नागरिक आणि संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या निर्णयाचा तीव्र निषेध करत आंदोलकांनी थेट राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे फोटो आणि पुतळे जाळल्याने राजस्थानात आता ‘मराठी विरुद्ध राजस्थानी’ असा प्रादेशिक वाद उभा राहिला आहे. महाराष्ट्र भाजपचे जुने जाणते नेते हरिभाऊ बागडे हे सध्या राजस्थानचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पदसिद्ध अधिकारानुसार ते राजस्थान विद्यापीठाचे कुलपती देखील आहेत. विद्यापीठाच्या अंतर्गत मराठी भाषेचा प्रचार, अभ्यास आणि संशोधन व्हावे या चांगल्या उद्देशाने त्यांनी कॅम्पसमध्ये ‘मराठी स्टडी सेंटर’ उभारण्यासंदर्भातील कायदेशीर निर्देश प्रशासनाला दिले होते. मात्र, त्यांचे हे निर्देश जाहीर होताच राजस्थानमधील स्थानिक अस्मिता आणि संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या संघटनांनी याला तीव्र आक्षेप घेतला. “राजस्थानात मराठी कशासाठी?” स्थानिकांचा संतप्त सवाल राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या या निर्णयामुळे संतापलेल्या आंदोलकांनी जयपूरसह विविध भागांत हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “राजस्थानमध्ये मराठी भाषेचे शिक्षण देण्याचे कारण काय?” असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी राज्यपालांचे पुतळे दहन केले. राजस्थानातील स्थानिक भाषा आणि इथल्या समृद्ध संस्कृतीला प्रोत्साहन देण्याऐवजी, विद्यापीठ प्रशासनाकडून इतर राज्यातील भाषेचे केंद्र का लादले जात आहे, असा सूर आंदोलकांकडून लावला जात आहे. या प्रकारामुळे राजस्थानमधील शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय वर्तुळात विरोधाभासाची जोरदार चर्चा या संपूर्ण प्रकरणाची सध्या महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. यामागे एक मोठा राजकीय विरोधाभास कारणीभूत ठरत आहे. महाराष्ट्रात गेल्या ८-१० महिन्यांपासून शालेय व उच्च शिक्षण स्तरावर हिंदी भाषा शिकविण्याच्या धोरणावरून भाजप आणि महायुती सरकारविरुद्ध तीव्र आंदोलने उभी राहिली आहेत. अशा वेळी भाजपचे नेते हिंदी भाषेच्या धोरणाची जोरदार पाठराखण करताना दिसतात. मात्र, त्याच भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने जेव्हा राजस्थानात जाऊन मराठी भाषेचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना तिथल्या स्थानिक भाजपच्या बालेकिल्ल्यातच तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. परराज्यात आपल्या मातृभाषेचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मराठी राज्यपालांना आता या प्रादेशिक वादाचा सामना कसा करावा लागतो आणि राजस्थान विद्यापीठ हे केंद्र सुरू ठेवते की आंदोलकांसमोर झुकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच:मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा, म्हणाले – त्यांच्यामुळे मराठा-वंजारी समाजात वैर राज्याच्या राजकीय वर्तुळात आगामी काळात होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असतानाच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विस्तारावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमन चर्चेवर जरांगे पाटील कमालीचे भडकले आहेत. “धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच. मुंडेंना पुन्हा मंत्री केले, तर मराठा समाज अंगावर येईल,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.