
अमरावती जिल्ह्यात पुन्हा तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’ राबवले जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मोजून दिल्या जातील. हे अभियान पुढील महिन्यात २१ ते २३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शेतजमिनीच्या रस्त्यांवरून, वहिवाटीवरून आणि पाणंद रस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये अनेकदा वाद होतात. या समस्या सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाकडे मागणी केली जाते, परंतु त्यासाठी जमिनीची मोजणी आवश्यक असते. मोजणीसाठी शुल्क कोण भरणार, यावरून नवीन वाद निर्माण होतात, ज्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात. याच बाबी लक्षात घेऊन राज्याचे महसूल मंत्री असलेले पालकमंत्री बावनकुळे यांनी या विशेष महाराजस्व अभियानाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हे अभियान राज्यभर राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत केवळ जमीन मोजणीच नव्हे, तर शेतकरी मदतीसाठी आवश्यक असलेले इतर दाखले देखील दिले जातील. यासाठी महसूल विभागाकडून विस्तृत नियोजन केले जात आहे. या महाराजस्व अभियानासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. या महाअभियानातून राज्यातील तब्बल ५० लाख कुटुंबांपर्यंत शासकीय सेवा आणि विविध योजनांचे लाभ थेट पोहोचवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’चा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीला सहाही विभागांचे विभागीय आयुक्त, तसेच महाराजस्व अभियान अंमलबजावणी समितीचे प्रमुख विक्रांत पाटील, सदस्य नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
