
अमरावती: पार्वतीनगर परिसरातील जलकुंभातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने सोमवारपासून सुरू झालेले दुरुस्तीचे काम मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) ने दिलेल्या माहितीनुसार, या जलकुंभाशी संबंधित सुमारे २५ हजार नागरिकांना बुधवार, १७ जून रोजी पाणी मिळण्याची शक्यता आहे. या बिघाडामुळे पार्वतीनगर, वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर आणि गडगडेश्वर यासह परिसरातील अनेक भागांतील नागरिकांना सोमवारी पाण्याविना दिवस काढावा लागला. अनेक रहिवाशांनी साठवलेल्या पाण्याचा वापर केला, तर काहींनी पर्यायी व्यवस्थेद्वारे पाण्याची सोय केली. मजीप्रा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलवाहिनीला जमिनीखाली सुमारे दीड मीटर खोल असलेल्या ‘डक फूट बेंड’ या जोडणीवर गळती लागली आहे. या ठिकाणी यंत्रांचा वापर करणे शक्य नसल्याने सर्व दुरुस्ती काम मानवी श्रमाद्वारेच करावे लागत आहे. गळतीमुळे जमिनीचा भाग दलदलीचा झाला असून, आधी साचलेले पाणी बाहेर काढून जमीन कोरडी करणे आणि त्यानंतर दुरुस्ती करणे असे काम सुरू आहे. जलकुंभातून पाणी बाहेर आणणारी २० मीटर उंच उभी पाईपलाईन जमिनीखालील आडव्या जलवाहिनीशी ‘डक फूट बेंड’ द्वारे जोडलेली आहे. नेमक्या याच ठिकाणी गळती झाल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे. मजीप्राचे उपविभागीय अधिकारी संजय लेवरकर यांनी सांगितले की, दुरुस्तीचे काम मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. लेवरकर यांनी पुढे सांगितले की, अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र या कामात व्यस्त आहेत. मात्र, दुरुस्तीदरम्यान नवीन काही अडचण आल्यास किंवा वादळ, वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे व्यत्यय आल्यास दुरुस्तीचा कालावधी वाढू शकतो. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
