
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून पाशवी लैंगिक अत्याचार केला आहे. या घृणास्पद प्रकारानंतर संपूर्ण परिसरात संतापाची मोठी लाट उसळली असून, संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलिस ठाण्याला वेढा घालत जोरदार निदर्शने केली आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित ७ वर्षांची मुलगी आपल्या इमारतीमधील वॉशरूममध्ये गेली होती. याच वेळी इमारतीत तैनात असलेल्या नराधम सुरक्षारक्षकाने वॉशरूममध्ये जबरदस्तीने प्रवेश केला आणि या निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. या अमानुष कृत्यामुळे पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला अटक; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात या भयंकर घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी तत्काळ कायदेशीर पावले उचलत गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत अत्याचार करणाऱ्या या नराधम सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. सध्या पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पायधुनी पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नागरिकांचा रास्तारोको घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांच्या संतापाचा अक्षरशः कडेलोट झाला. शेकडो नागरिकांनी एकत्र येत पायधुनी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली. संतप्त जमावाने मुख्य रस्ता अडवून धरत ‘रास्तारोको’ केला, ज्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. “नराधम आरोपीला तत्काळ पोलिस स्टेशनमध्येच फाशी द्या,” अशी आक्रमक मागणी जमावाकडून केली जात होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना घेराव घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पायधुनी पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र, उद्विग्न झालेल्या जमावाने आणि पीडितेच्या नातेवाईकांनी त्यांनाही थेट घेराव घालत आपला जोरदार रोष व्यक्त केला. अखेर पोलिसांनी अत्यंत संयमाने नागरिकांची समजूत काढत जमावाला बाजूला केले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. मुंबईत चिमुकल्या मुली सुरक्षित आहेत का? महिला आणि मुलींसाठी देशात सर्वांत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरात सातत्याने अशा घटना उघडकीस येत आहेत. सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकानेच हे नीच कृत्य केल्याने पालकांमध्ये मोठी भीती आणि चिंता निर्माण झाली आहे. या ताज्या घटनेमुळे मुंबईतील महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. हे ही वाचा… वारीमध्ये वारकऱ्यांसाठी गढूळ पाण्याचा पुरवठा:जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी, पण वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ; विरोधकांची सरकारवर टीका पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारकऱ्यांना पिण्यासाठी गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप करत, विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “जनतेच्या करातून जमा झालेला पैसा जाहिरातींवर उधळला जातोय, पण वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या नावाने मृत्यूचा सापळा रचला जात आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
