
टाकळी ते लाडसावंगी दरम्यान सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामात ढिसाळ कारभार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी विलास डमाळे यांच्या शेतापासून ते साईबाबा चौकापर्यंत नव्याने सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर केवळ सुकी पोती अंथरून ठेवून त्यावर अजूनपर्यंत पाणीच मारण्यात आलेले नाही. त्यामुळे हा नवा रस्ता अल्पावधीतच उखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंट रस्ता मजबूत आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने ‘क्युरिंग’ म्हणजेच पाणी मारून ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक असते. तांत्रिक निकषानुसार, सिमेंटचा रस्ता तयार झाल्यानंतर किमान ७ ते १४ दिवस त्यावर नियमितपणे पाणी मारणे गरजेचे असते. मात्र, विलास डमाळे यांच्या शेतापासून ते साईबाबा चौक दरम्यानच्या या भागात दोन दिवस उलटूनही पाण्याचा एक थेंबही टाकण्यात आलेला नाही. रस्त्याला वेळेवर पाणी न मिळाल्यास सिमेंटला अंतर्गत तडे जाण्याची आणि वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ता लवकरच उखडण्याची भीती स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तातडीने रस्त्यावर पाणी मारण्याचे आदेश देऊन रस्ता गुणवत्तापूर्ण व मजबूत करून घ्यावा, अशी आग्रही मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या रस्त्यावर सध्या पोती अंथरण्यात आली असून, त्यावर पाणी मारण्यात आलेले नाही. त्यामुळे तातडीने पाणी मारण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
